मुंबई : प्रतिनिधी
तत्कालीन सहाय्यक संचालक (हिवताप व जलजन्य आजार) डॉ. राधाकिशन पवार यांनी राज्यभरातील वर्ग 3 आणि 4 मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासन निर्णय आणि नियम अटींना डावलून केल्या आहेत. ज्यामध्ये परिचारिका, लिपिक, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहन चालक, क्ष-किरण तंत्रज्ञ, आरोग्य निरीक्षक, तालुका पर्यवेक्षक आदी पदांचा समावेश आहे. या बदल्या करताना शासनाकडील सर्व स्तरावरील मंजुऱ्या घेणे, शासन निर्णयातील तरतुदीनुसार संवर्ग निहाय व संख्या निहाय तसेच सर्व वरिष्ठ व कनिष्ठ पातळ्यांवर मंजुरी घेणे, महाराष्ट्र नागरी सेवा मंडळाची बैठक घेऊन अंतिम संख्या व यादी निश्चीत करून मंजुरी घेणे अपेक्षित आहे. परंतु शासन निर्णय आणि सर्व नियम अटींना डावलून सदरच्या बदल्या केल्या आहेत, तरी संबंधीत अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कास्ट्राईब संघटनेने प्रधान सचिव निपुण विनायक यांच्याकडे केली आहे.
कास्ट्राईब संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन सहाय्यक संचालक (हिवताप व जलजन्य आजार) डॉ. राधाकिशन पवार यांनी त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या राज्यभरातील वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या मनमानी पध्दतीने केल्या आहेत. या बदल्या विनंतीनुसार व प्रशासकीय पद्धतीने करण्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केले आहेत. त्या शासनाच्या धोरणानुसार व शासन निर्णयानुसार (विनंती किंवा प्रशासकीय) बदल्या करणे हे सहायक संचालक यांच्यावर बंधनकारक आहे. परंतु सन 2022-23 व 2023-24 या वर्षात या विविध संवर्गाच्या बदल्या करताना सर्व शासन निर्णय व धोरणांना हरताळा फासल्याचे दिसून येत आहे. शासन निर्णयानुसार सर्व संवर्गातील बदल्या करण्यापूर्वी शासनाकडे सर्व स्तरावरील मंजुरा घेणे व एकूण शासन निर्णयातील तरतुदीनुसार संवर्ग निहाय व त्यानुसार संख्या निहाय सर्वांना सर्व कनिष्ठ व वरिष्ठ पातळीवर मंजुऱ्या घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा मंडळाची बैठक घेऊन अंतिम संख्या व यादी निश्चित करून मंजुरी घेणे अपेक्षित आहे. परंतु राधाकिशन पवार यांच्या कालावधीत हे सर्व नियम डावलण्यात आल्याची तक्रार वरिष्ठांकडे कास्ट्राईब संघटनेने केली आहे. यामध्ये बदली धोरणानुसार वर्षातून एकदाच आणि शासन निर्णयानुसार फक्त 10 टक्के विनंती बदल्यांना मंजुरी असताना डॉ. राधाकिशन पवार यांनी संपूर्ण वर्षात बदल्यांचा सपाटा लावला होता. या बदल्या करताना ज्यांची सेवा सध्याच्या ठिकाणी सुरू आहे, त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी पदोन्नती दिल्याचे आढळून येत आहे. तसेच पात्र नसताना विनंती बदल्या केल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या सहा महिने ते एक वर्षाच्या आत त्यांच्या पसंतीनुसार तीन ते चार वेळा बदल्या केल्याचे संघटने म्हटले आहे.
या सर्व बदल्या प्रक्रियेत “लक्ष्मी दर्शन” झाल्याची तक्रारही यापूर्वी कास्ट्राईब संघटना आणि इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनने दिली होती. तसेच बदल्यांतील विविध पदांचे “रेट कार्ड”ही उघडकीस आणले होते. त्यामुळे प्रधान सचिव निपुण विनायक यांच्याकडून चौकशी समिती रेमूण बदल्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब घ्यावेत आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कास्ट्राईबने केली आहे. याबाबत तत्कालीन सहाय्यक संचालक (हिवताप व जलजन्य आजार) डॉ. राधाकिशन पवार यांची प्रतिक्रीया घेतली असता त्यांनी सर्व बदल्या नियमानुसार केल्या आहेत, अशी प्रतिक्रीया दिली.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवारांकडून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय
श्री. परमेश्वर आश्रमशाळेतील बेकायदेशीर ठरवलेल्या 16 शिक्षकांना वरदहस्त कोणाचा ?
पालकमंत्री गोरेंच्या समोरच आमदार आवताडेंचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंवर टक्केवारीचा आरोप