सोलापूर : प्रतिनिधी
अर्थसंकल्पाचा संदर्भ फक्त उद्योजक, व्यापारी किंवा सीए यांच्याशी नसून अर्थशास्त्र हे सर्वस्पर्शी आहे. प्रत्येकाने अर्थसाक्षर असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील अधिष्ठाता प्रा. डॉ. वसंत जुगळे यांनी केले.
हिराचंद नेमचंद वाचनालयातील लोकमान्य टिळक सभागृहात प्रा. डॉ. संतोष कदम लिखित “अर्थसंकल्पाविषयी सर्व काही” या पुस्तकाच्या प्रकशानावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष पी. एल. कोळी होते. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राचार्य नरेश बदनोरे, विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, अर्थविश्लेषक प्रा. संजय ठिगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य एम. डी. कमळे, प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. जुगळे म्हणाले, “अर्थसंकल्पाविषयी सर्व काही” या पुस्तकात अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया विशद केलेली दिसून येते. त्याबाबतचे बारकावे वाचल्यानंतर लक्षात येतील. त्यापुढे जाऊन सरकारच्या तिजोरीत पैसा कुठून येतो, यावर आता चिंतन करायची गरज आहे. आता आपल्याकडे लग्न कधी करावं, मूल कधी जन्माला घालावं हे सुद्धा अर्थकारणावर अवलंबून आहे. समाजातील प्रत्येक माणूस अर्थशास्त्राशी निगडित आहे. त्याचा अर्थसंकल्पाशी संबंध येतोच. त्यामुळे प्रत्येकाने अर्थसाक्षर असले पाहिजे. स्मार्ट रिलेशन्स ऑफ रूपी म्हणजे वित्तीय साक्षरता होय.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना पी. एल. कोळी म्हणाले, सामान्य माणसाला अर्थसंकल्पाविषयी फार काही देणे-घेणे नसते. पण अर्थसंकल्पाचा परिणाम हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येकावर होत असतो. त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी आपण जाणून घेतले पाहिजे. इनकमिंग आणि आउटगोईंग हे दोन भाग ज्या पद्धतीने अर्थसंकल्पात असतात. तसेच शासन व्यवस्था चालण्यासाठी इनकम महत्त्वाचे असते. ते कराच्या रूपाने व दंडाच्या रूपाने तिजोरीत येत असते.
लेखक प्रा. डॉ. संतोष कदम म्हणाले, “अर्थसंकल्पाविषयी सर्व काही” या पुस्तकाची बीजं खरं तर मी एमएच्या दुसऱ्या वर्षात असताना रूजली म्हटले तर वावगे ठरणार नाही. तेव्हा वर्तमानपत्राच्या कार्यालयात टिपण लिहिले तेव्हापासून पुस्तकाची मनात प्रक्रिया सुरू झाली. तुटीचा अर्थसंकल्प सादर करणे म्हणजे ते प्रगतीकडे जाण्याचे लक्षण असते, असे मला वाटते.
या वेळी फडके प्रकाशनचे मंदार फडके यांनी पुस्तक छापण्याविषयीची भूमिका स्पष्ट केली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विजय साळवे यांनी केले. प्रा. डॉ. आर. के. पाटील यांनी आभार मानले. या वेळी सांगली, कोल्हापूर, अंबाजोगाई, मोहोळ, माढा येथून अर्थशास्त्राचे जाणकार उपस्थित होते.
अर्थसंकल्प १७ टप्प्यांमधून मंजुरी घेऊन जातो…
पुस्तकावर भाष्य करताना प्रा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले, अर्थशास्त्र ज्या पद्धतीने सोप्या भाषेत सांगण्याचे कौशल्ये डॉ. संतोष कदम यांच्याकडे आहे. त्याप्रमाणे त्यांनी अर्थसंकल्प सोप्या भाषेत सांगितला आहे. अर्थसंकल्प १७ टप्प्यांमधून मंजुरी घेऊन जातो, ही संपूर्ण प्रक्रिया काय असते. याचा उहापोह अगदी सोप्या भाषेत या पुस्तकात मांडला आहे. हे पुस्तक अर्थशास्त्राचे अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे.
खऱ्या अर्थाने “अर्थसंकल्पाविषयी सर्व काही” या पुस्तकात मिळते
अर्थविष्लेशक प्रा. संजय ठिगळे म्हणाले, प्रत्येकाचे अर्थशास्त्र वेगळे असते. कुणावर किती पैसा खर्च करायचा? कसा खर्च करायचा ? हे आपण ठरवतो. पण रुपाया आणणे सोपे नसते. रुपया खर्च करणे सहज शक्य असते. भारतात सादर होणारे बहुतांश अर्थसंकल्प हे तुटीचेच सादर केले जातात. या पुस्तकातून खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पाविषयी सर्व काही मिळते. लेखकाने याचे ई-बुक काढावे.
सामान्य माणसाला अर्थसाक्षर करण्यास उपयोगी पडेल
प्राचार्य नरेश बदनोरे म्हणाले, सामान्य माणसाला अर्थव्यवहार कळावा यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे. कराच्या आकारणी ते आयात-निर्यात धोरण यापर्यंत या अर्थप्रक्रियेच्या मागे काय आहे, याचा वेध या पुस्तकात लेखकाने घेतला आहे. अर्थसंकल्पविषयीचे व्यापक आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे हे महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाची सामान्य माणसाला अर्थसाक्षर होण्यासाठी मदत होईल.
‘इंदिरा आयव्हीएफ’च्या सर्व सेंटर्सवर तत्काळ बंदी आणून तनिषा भिसेंना न्याय द्या